नवी दिल्ली येथे संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असून या अधिवेशनात वेगवेगळ्या मुद्द्यांवरुन खासदार आक्रमक होताना दिसत आहेत. सांगलीचे खासदार विशाल पाटील देखील सरकारवर कडाडले असून त्यांनी, जत तालुक्यातील प्रकरणावरून संसदेत प्रश्न उपस्थित केला आहे.
केंद्रीय अर्थसंकल्प मांडताना तुम्ही महिला सुरक्षेवर काय तरतूद केली आहे? असा सवाल केला आहे. जत तालुक्यातील एका गावात मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिचा खून करण्यात आला. यावरून जिल्ह्यातील वातावरण सध्या चांगलेच तापलेलं आहे. दरम्यान अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी देखील केंद्रीय अर्थसंकल्प सांगलीचे नाव देखील घेतलेले नाही. यावरून देखील खासदार विशाल पाटील यांनी संसदेत मोदी सरकारवर जोरदार टीका केलीय.
विशाल पाटील यांनी, अर्थसंकल्पावर मत व्यक्त करताना, सांगली आणि पश्चिम महाराष्ट्राचा नामोल्लेख टाळण्याचा अर्थमत्र्यांनी ‘विक्रम’च केलाय. देशाला सर्वाधिक कर देणाऱ्या महाराष्ट्राच्या विकासासाठी आर्थिक तरतूद करण्यात सरकार मुद्दाम दुर्लक्ष करत असल्याचा आरोप विशाल पाटील यांनी केला आहे. तर कर रचनेवर हल्लाबोल करताना त्यांनी सरकार मध्यमवर्गावर आणखी किती बोजा वाढवणार आहे का? असाही सवाल केला आहे.
महाराष्ट्राकडे दुर्लक्ष केल्याने भाजपला लोकसभा निवडणुकीत फटका बसला होता. त्यामुळे या वेळी तरी महाराष्ट्रासाठी काही ठोस मिळेल, अशी अपेक्षा होती. सांगलीसारख्या शहरांचा ‘स्मार्ट सिटी’त समावेश, महाराष्ट्रातील विमानतळांची संख्या वाढवणे, सिंचन योजनांसाठी निधी देणे, ‘आयआयटी’, ‘आयआयएम्स’ सुरू करणे, खतांवरील जीएसटी हटवणे, आशा सेविकांची मानधनवाढ अशा कोणत्याच गोष्टीकडे सरकारने लक्ष दिलेले दिसत नाही.
तर शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करू असे आश्वासनाचे काय? शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचे काय? भाजपने निवडणुकीपूर्वी तशी घोषणा केली होती. शेतकरी कर्ज परतफेडीच्या स्थितीत नाहीत. जे परतफेड करू शकतात, तेही सरकारच्या आश्वासनाला बळी पडले आहेत. या स्थितीत महाराष्ट्रातील ग्रामीण व्यवस्था पूर्ण ‘व्हेंटिलेटर’वर गेली आहे. अर्थसंकल्पात या विषयावर काहीतरी बोलायले हवे होते. सरकार शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार आहे की नाही, हे जाहीर करा. देणार नसाल तर घोषणा हा जुमला होता, असे जाहीर करा.”
- एका मुलाचा फोटो, लग्न दुसऱ्याशीच…
यावेळी विशाल पाटील यांनी राज्यातील महायुती सरकारवर देखील जोरदार टीका केली आहे. त्यांनी राज्यातील सरकार हे पूर्वी लग्नासाठी जे लोक करायचे तसचं आता करत आहे. पूर्वी लग्नासाठी एका मुलाचा फोटो दाखवायचा आणि दुसऱ्याबरोबरच लग्न लावून द्यायचे, असा प्रकार होता. आता राज्यात तसेच झालं आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा चेहरा दाखवून निवडणूक जिंकली आणि दुसरेच वरातीच्या घोड्यावर बसले. ‘मॅन ऑफ द मॅच’ला बारावा खेळाडू बनवले आणि बाराव्या खेळाडूला कॅप्टन करून टाकल्याचा टोला लगावला आहे.




