बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात असलेल्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची 09 डिसेंबरला अत्यंत निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेमुळे बीडमध्ये गुंडाराज पुन्हा एकदा डोके वर काढू पाहात असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
तर या प्रकरणाचे पडसाद हिवाळी अधिवेशनातही उमटल्याचे पाहायला मिळाले. विरोधकांनी बीड हत्या प्रकरण आणि परभणीच्या घटनेवरून 101 अन्वये स्थगन प्रस्ताव मांडला होता. या प्रस्तावावर विरोधक आणि सत्ताधारी यांच्यामधील सदस्यांनी दोन दिवस चर्चा केली.
स्थगन प्रस्तावावरील दोन दिवसीय चर्चेनंतर शुक्रवारी (ता. 20 डिसेंबर) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवेदन देत उत्तर दिले. फडणवीसांनी बीडमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणी बीडचे पोलीस अधिक्षक यांची बदली करण्याची घोषणा केली आहे. तर या प्रकरणी एसआयटी आणि न्यायालयीन चौकशी करण्यात येईल, अशी माहिती सुद्धा फडणवीसांकडून विधानसभेत देण्यात आली आहे.




