-
खास प्रतिनिधी – मंत्रालय टाइम्स
संतोष देशमुख खून प्रकरणात तपास करणाऱ्या विशेष पथकातील काही पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांबद्दल देशमुख कुटूंबियांना शंका आहे. त्यामुळे या मंडळींना तपास प्रक्रियेपासून दूर ठेवण्याची मागणी आपण मुख्यमंत्र्याकडे केली आहे.वाल्मिक कराडने गडचिरोली येथून बदली करुन आणलेला एक पोलिस कर्मचारीही यात आहे.
काही लोक त्याच्या अतिसंपर्कात आहेत. तत्कालीन पालकमंत्र्यांनी आपले पद भाड्याने दिल्याने त्यांच्या शिफारसीने काही कर्मचारी आलेले आहेत. अशा कर्मचाऱ्यांनी त्यांची स्वामीनिष्टा दाखवू नये, यासाठी ही मागणी केल्याचे सुरेश धस म्हणाले.
श्री. धस यांनी शु्रकवारी (ता. तीन) विविध मुद्द्यांवर संवाद साधला. सरपंच संतोष देशमुख खूनातील आरोपी सुदर्शन घुले हा कराडच्या अतिशय जवळचा कार्यकर्ता आहे. आपल्या ‘आका’ला (वाल्मिक कराड) ‘आम्ही किती खतरनाक आहोत’ हे दाखविण्यासाठी त्यांनी इतक्या निर्घुणपणे हत्या केली असावी.
परंतु आता सीडीआरमधून सगळं बाहेर येणार आहे. त्यामुळे ‘आका’ (कराड) वाचनं अशक्य आहे. करुणा मुंडे यांच्या वाहनात पिस्तूल ठेवणारी व्यक्ती देखील पोलिस दलातीलच होती. त्याने कोणाच्या सांगण्यावरून ते काम केल, त्याच नाव देखील मला माहिती असून ते आपण पोलिस अधीक्षकांना सांगणार आहोत.
मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी त्यांच्याच प्रकाश सोळंकेंची आहे. नैतिकतेच्या आधारावर सोळंकेंच्या मागणीला आपला पाठींबा आहे. या प्रकरणात त्यांचा संबंध आहे असे आपण म्हणणार नाही. पण देशमुख खून प्रकरणाची चार्जशिट दाखल होईपर्यंत त्यांनी बिनाखात्याचे मंत्री राहावे.
परळीत औष्णीक विज केंद्राच्या राखेचं भयान वास्तव आहे. सिरसाळा येथे ३०० अवैध विटभट्टी आहेत. ज्याने राख उचलण्याचे कंत्राट घेतले आहे त्याचे वाहन सुद्धा तिथे उभा करू देत नाहीत. याबाबत आपण पत्र दिले आहे. प्रदूषण महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी याबाबत कारवाई नाही केली तर ते प्रदूषण रोखण्यास अयशस्वी ठरले यबाबत कारवाईची मागणी करणार आहे.
- फडणवीस किंवा पवारांनी व्हाव पालकमंत्री
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था सुरळीत हेाईपर्यंत जिल्ह्याच पालकमंत्री पद घ्यावे. त्यांना शक्य नसेल तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घ्यावे ते देखील चांगल काम करू शकतात, असेही सुरेश धस म्हणाले.
- सर्वच मोर्चांत सहभागी होणार
संतोष देशमुख हत्या हा विषय पक्षाचा राहिला नाही तर जनआक्रोश आहे. याचं निराकरण व्हायला हव, असे सुरेश धस यांनी व्यक्त केले. आपण परभणी, पुणे येथील मोर्चात सहभागी होणार असून संभाजीराजेंनी राज्यपालांना याबाबत भेटण्यासाठी सोबत बोलविले आहे तीथेही जाणार असल्याचे त्यांनी नमूद केले.




